शब्दवेडी लिहिते...
Sunday, 10 September 2023
वाफाळलेल्या पत्रातून...
Friday, 31 December 2021
हा, मर्द को भी दर्द होता है!
कोवळ्या वयातील बहिणीचे लग्न लावून दिल्यावर त्याबद्दल हळहळ वाटून ढसाढसा रडणारा कुणी भाऊ मी तरी क्वचितच पहिला असेन. बायकोच्या डिलिव्हरी वेळी प्रचंड अस्वस्थ होऊन तिच्या वेदना वाटून घेता येत नाहीत म्हणून कासावीस झालेला कुणी नवरादेखील मला सहसा पाहायला मिळत नाही. मला त्रास होतो, वेदना होतात कुणी माझ्याशी वाईट वागल्यावर, असं ठणकावून सांगणाऱ्या आणि अश्रूंना कमजोरी न मानणारे असे मित्र सुद्धा मला कमीच पाहायला मिळाले आणि यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे तो पुरुष जातीत जन्माला आला.
लहानपणापासून आपण हेच ऐकत आलेलो आहोत की, 'मर्द को कभी दर्द नही होता!' का? तो माणूस नाही का? त्याला सुद्धा भावभावना, प्रेम हे सगळं वाटत असेलच की! मग का त्याने ते व्यक्त करण्यात कुचराई करावी? अर्थात यालाही जबाबदार समाजाच आहे. कारण मुलगा म्हणून जन्म घेतला की त्याच्या मनावर हेच बिंबवलं जातं की तू मुलगा आहेस. मुलं रडत नाहीत. मुलं कणखर असतात. लेचपेचं राहणं मुलांच्या जातीला शोभत नाही, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींचा भडीमार हा त्याच्यावर अगदी लहानपणपासूनच होत असतो म्हणून पुरुष आपल्या भावना व्यक्त करायला धजावत नाही.
सगळ्या घराला सांभाळणे हे केवळ पुरुषाच्याच हातात असते त्यामुळे ‘एक पुरुष म्हणून तू धीट आणि कणखरच राहायला हवं’ असं प्रत्येकवेळी त्याला सांगितलं जातं. त्यामुळे काही दुखत खुपत असताना किंवा मनात खूप काही साठलेलं असताना ते सांगण्याची चोरीच त्याला स्वतःच्या घरात झालेली असते. आपला बाबा रडतो आहे असं कधीतरीच एखाद्याने पाहिलेलं असावं कारण बाबा हा नेहमी तापट असतो मायाळू, प्रेमळ अशी बिरुदं त्याला लागू होतच नाहीत असा समज आपल्या समाजाने घालून दिलेला आहे. त्यामुळे समाजाच्या समजूतीपेक्षा काहीतरी वेगळं असं घडायला सुरूवात झाली की तिथेच पुरुष म्हणून त्याच्या स्वभावाची खिल्ली उडवायला सुरूवात होते. आपण रडलो तर लोक काय म्हणतील? याचाच विचार प्रत्येक वडील, भाऊ आणि एक पुरुष म्हणून त्याच्या मनात येतो आणि तिथेच तो त्याची भावना दाबून अगदी कुस्कुरून त्याचा चुराडा करून टाकतो.
घरात कोणती अडचण असली किंवा जावाजावात काही झालं की बायका इकडच्या गोष्टी तिकडे करण्यात एक सेकंद सुद्धा घालवत नाहीत. पण पुरुषांचे तसे नसते. त्याला असलेल्या अडचणी बोलून दाखवता येत नाहीत किंवा त्या समजून घ्यायला सुद्धा त्याच्याकडे कोणी नसतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. मूळात आपल्या समाजात रडणं हेच दुबळेपणाचं लक्षण मानलं जातं. त्यात पुरुष रडतोय हे म्हटल्यावर तर काय बाईसारखं रडतोयस हे न चुकता ऐकायला मिळतं. एवढंच काय पण जर त्याला एखाद्याचे वागणे पटले नसेल आणि त्याबद्दल तो बोलू लागला की लगेच काय चहाड्या करतोस बायकांसारख्या हे त्याला ऐकायला मिळते. एखाद्याला सतत आपल्या भावना बोलून दाखवता येत नाहीत म्हणून त्यासाठी कृतीचा आधार घेतला जातो. जेव्हा पुरुषाला व्यक्त होता येत नाही तेव्हा त्याच्या वागणुकीत फरक पडतो. हसून खेळून राहणारा कमालीचा शांत होतो. रागीट माणूस मवाळ होतो तेव्हा आपणच समजून घ्यायचे असते की मर्द अभी दर्द में है! व्यक्त होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे मग ज्याला त्याला रडून, हसून, प्रेमाने, रागाने कसं का होईना व्यक्त व्हायचं असेल तर त्याला व्यक्त होऊ दिलं पाहिजे. त्याच्यावर समाजाच्या तकलादू प्रतिष्ठेची बंधनं लादता कामा नये.
जाती आणि लिंगभेदाचा बाजार आपण सगळीकडे मांडतोय पण भावना व्यक्त करायच्या बाबतीत तरी तो पुरुष आणि ती स्त्री असा भेदभाव न केलेला बरा. जेव्हा समाजाच्या मानसिकतेत फरक पडेल तेव्हाच पुरुषांना सुद्धा रडताना कसलीच लाज वाटणार नाही. त्यालाही रडून मोकळं होणं कायं असतं याचा अनुभव खुलेपणाने घेता येईल. तेव्हा कुठे पुरुषांचा व्यक्त होण्यासाठीचा संघर्ष संपेल आणि 'मर्द को भी दर्द होता है' असं म्हणून आपण त्याच्या दु:खात सामील होऊन त्याला धीर देऊ शकू.
Saturday, 13 March 2021
अवनी...!
प्रिय अवनी,
काल तुला गोळ्या घालून मारण्यात आल्याचं कळालं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.किती निर्दयी लोकं असतील ती?तू त्यावेळेस किती विव्हळली असशील...तू माणसांना खातेस,१३लोकांना तू तुझं भक्ष्य बनवलस आणि २५ गावात तुझी दहशत होती,असे त्यांनी तुझ्यावर आरोप लावलेत. क्रूरतेच्या साऱ्या सीमा पार केलेल्या लोकांना तुझ्यावर गोळ्या झाडताना आणि रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या तुला कसं बघवल गेलं असेल?हा सगळा विचार करतानाच मला सुन्न व्हायला झालंय.
तू काल गेलीस म्हणून काही संवेदनशील व आस्था वाटणाऱ्या लोकांकडून तुझ्याविषयी सोशल मीडियावरून हळहळ व्यक्त केली जात आहे,पण तिथेच तुझ्या दहशतीच्या गर्तेत अडकलेल्या लोकांकडून फटाके उडवून त्यांनी सुटकेचा आनंद साजरा केला.तेव्हा कीव करावीशी वाटली मला त्या लोकांची आणि त्यांच्या गोठलेल्या भावनांची.तुला मारण्यासाठी कित्येक कर्मचारी,हत्ती,शार्पशूटर, पिंजऱ्याची जमवाजमव केली होती.full planned होतं ते सगळंच! तू 'वाघीण' होतीस म्हणून तुझी दहशत होती.तू बोकड असतीस तर तुझेच लचके याच लोकांनी तोडून,मसाला मारून पार मिटक्या मारत खाल्ले असते.
एकीकडे हेच लोक वाघ वाचावे म्हणून मोहिम्या आखतात,वाघांची संख्या कमी झाली म्हणून चर्चा करतात आणि दुसरीकडे याच लोकांनी तुझी हत्या करताना मागे पुढे देखील पाहिले नाही.तू लोकांचे बळी घेतलेस याचे दुःख आहेच,पण दोष पूर्णपणे तुझाही नाही.तुझ्या निवासाचे ठिकाण असणाऱ्या जांगलावरही यांचा डोळा आहे म्हणल्यावर तू तरी काय करणार? अवनी,तुझे जरा चुकलेच पण तुझ्या चुकीसाठी आमच्या जगतात कुठलेही न्यायालय नाही की शिक्षेची तरतूद नाही;नाहीतर तूही जबाब देऊ शकली असतीस.तुला जन्मठेप झाली असती,मग कसेतरी तू तुझे दिवस रखडले असतेस.निदान आत्ता अचानक मायेचे छत्र हरवल्याप्रमाणे तुझे बछडे पोरके तरी झाले नसते.मग तू परत तुझ्या राज्यात परतली असतीस.पण ते राज्य तरी आत्ता कुठं नीट राहिलय,तीही मनुष्यवस्तीच बनत चालली आहे.या लोकांना कळत नाहीये हे त्यांच्या कृतीने तुमचा आणि पर्यायाने अापलासुद्धा आधीवास धोक्यात आणत आहेत.
इकडचा न्याय आणि कायदा जरा वेगळा आहे.इथे हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्याला फाशीची शिक्षा होऊनही ते वर्षानुवर्षे जगतात.काय करणार?कायदेच माणसांच्या सोयीने बनवले आहेत.जर यांनाही गोळ्या घालून असे संपवता आले असते तर दहशतीच्या मार्गावर चालणारे सुद्धा शांततेत जगले असते.असो,तू गेलीस पण मागे एक विचार करायला लावणारा प्रश्न देऊन गेलीस,जो प्रत्येकाच्या डोक्यात दहशत पसरवेल एखाद्या वाघिणीप्रमाणेच...!
तुझीच बछडी,
अदिती.
गोल्डन डेज...!
हो!असा 'कट्टा' माझ्या आयुष्यात आहे आणि मला तो कायम माझ्या आठवणीत राहील,तो म्हणाजे "NSS कट्टा"national service scheme असा त्याचा fullform. राष्ट्राची सेवा करण्या हेतूने आपल्या माणसांनी बांधलेला हा कट्टा.या कट्ट्यावर मला मित्र मैत्रिणी कमीच पण भवा बहिणीची नाती जोपासणारी माणसे भेटली. कॉलेजमध्ये पाऊल पडताच माझी पाऊले आपसूकच कत्त्याकडे वळतात.कट्टा तसा निर्जीव, सिमेंट विटांनी बांधलेला,पण आमच्यात नवतरुण्याचे चैतन्य निर्माण करण्याचं काम तो अगदीच चोख करतो.
Tuesday, 27 November 2018
राम मंदिर की रामराज्य?
सेनेने थेट आयोध्या गाठून कमळाला अधिकच चिखलात रूतण्यास भाग पाडले.इकडे यांनी अयोध्या जवळ केली खरी पण हे वरवरचे आहे की खरेच श्रीरामभक्त आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.मनसेच्या सर्वेसर्वानी काढलेल्या व्यंगचित्रातून रामराज्य हवे होते, राममंदिर नव्हे असा टोला लगावला गेला.रामराज्य म्हणजे रामाचे राज्य नव्हे तर रामाची मूल्ये घेऊन जगणारे रामराज्यातील सामान्यजन.जिथे राजा व प्रजा यांना समान पारड्यात तोलले जायचे.जिथे जातीय वर्चस्व,दहशतवाद ,खून,हाणामारी,बलात्कार यांना थारा नव्हता.आज आपण रामायणातील कथा सांगताना शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा ऐकतो,जी की लोकांना राजाचे सामान्यपण आणि समानता यांचे सार्थ दर्शन देते.असे हेच दर्शन या राज्यात होणे या जन्मी तरी शक्य आहे काय?
ने म्हणजे नेक,ता म्हणजे तारणहार.असा खरं तर नेता या शब्दाचा अर्थ.पण येथे दिसणाऱ्या राज्यात जो लोकांचं नेतो तो नेता हा अर्थ रूढ होतोय.या राज्यातील नेता म्हणजेच राजा.असा राजा की ज्यात रामाचा लवलेशही नसावा.आज सरकारविरोधी बोलणाऱ्याचे काय होते हे न बोललेलेच बरे!कारण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याचा आमच्या राज्यात प्रघातच आहे.राजाची मर्जी राखण्यासाठी म्हणून इतर मंत्रीसुद्धा मूग गिळून गप्प आहेत. होयबा संस्कृती राबवण्याचा यांचा कल प्रकर्षाने दिसून येतोय.याचीच साक्ष हा चव्हाट्यावर आलेला वाद दर्शवतो.
स्त्रीदाक्षिण्य हे रामराज्याचे वैशिष्ट्य. असहाय अहीलेल्या रामाने मदत केली,मर्यादा ओलांडणाऱ्या शूर्पणखेला शिक्षा दिली.असे वर्तमानकाळात आजच्या स्त्रियांचे आहे का?आजच्या वर्तमानकाळात सर्वच बाबतीत ठणठणीत दुष्काळाच दिसतो.ना त्या निर्भिडपणे व्यक्त होतात ना मते मांडतात.एवढेच काय पण या उतरत्या कळेस चारचांद लावण्याचे लावले ते #meetoo ने.अशी वेळ ही या राज्यात यावी हीच खरी शोकांतिका आहे.राजाचे मुख्य कार्य हे जनतेत शांतता राखण्याचे असते.युध्याच्या वेळी राजा जनतेत अराजकता माजू नये यासाठी कटिबद्ध असतो आणि सद्य स्थितीत निवडणुका म्हणजे एक युद्धच आहे.ऐन निवडणुका तोंडावर असताना याच लोकांना नामी शस्त्र मिळाले ते म्हणजे 'राम' .पाहायला गेले तर ना यांच्या मनात राम ना बोलचालीत.
'प्राण जाये पर वचन ना जाये' याचेच डंके वाजवणारे हे लोक आपली पोळी मात्र चांगलीच भाजून घेत आहेत.सद्य स्थिती रामराज्याचे कोणतेच अवलोकन करताना दिसत नसेल तर राममंदिराची नेभळट आशा तरी काय कामाची?जिथे स्त्रियांच्या कर्तृत्वाची,कार्याची दखल घेतली जात नाही.तिचे अस्तित्वच मुळात धोक्यात आहे अशा राज्यात राममंदिर तरी काय कामाचे?वनवासी जाण्याची आज्ञा झाल्यावर सीतेने राज्यकारभार चालवावा अशी रामाने इच्छा दर्शवली.यातून रामराज्यातील स्त्रियांचे स्थान स्पष्ट होते.सद्य परिस्थितीत मात्र स्त्रियांचे पाय खेचण्याचेच दृश्य पहावयास मिळते.हा अजून एक पुरुषप्रधान संस्कृतीचा उत्तम नमुना म्हणता येईल.
रामराज्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण,कला ,आरोग्य यांना प्राधान्य.मात्र आजचे चित्र काही विपरितच आहे.सामान्य जनांसाठी चालू केलेल्या योजना त्या गरजूपर्यंत पोहचतच नाहीत हीच खरी परिस्थिती आहे.
इथे सगळे फक्त सत्तेचे उपासक आहेत.रामराज्य मागणाऱ्यांनी तरी नशिकात कुठे रामराज्य प्रस्थापित केले?नुसतीच आश्वासनांची सखरपेरणी करून टाळूवरचे लोणी खाणारी यांची जातच इथे अधोरेखित होते.जनतेला गरज ही राममंदिराची नव्हे तर रामराज्याचीच आहे.परंतु सल्ले आणि राजकीय टीकाटिप्पणी यातून फुरसत मिळेल तर हे साकार होईल.इथे कमळाने तरी नवीन असे काय केले,तर जनतेसाठी झटणाऱ्या तुकाराम मुंढेना बदलीची शिक्षा दिली.हेच ते रामराज्य आणि हेच ते इथले कायदे सगळेच धाब्यावर बसवलेले!
आमच्यासारख्या सामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून,गळचेपी करून राममंदिराचे स्वप्न कधीच साकार होणार नाही.जेव्हा मनातल्या. रामासाठी मंदिराचे दरवाजे खुले होतील तेव्हा कुठे रामराज्याचे आणि पर्यायाने राममंदिराचे स्वप्न सफल संपूर्ण होईल.
✍अदिती मळेकर.
Thursday, 1 November 2018
खिडकीतून खिडकीबाहेर
जेव्हापासून खिडकीत बसायला झालंय तेव्हापासून मी वेगळ्याच विश्वात रममाण होत चालली आहे.जराशी उसंत मिळाली की खिडकीची दारे मला आपसुकच बोलवत असल्याचा क्षणभर भास होतो आणि मी नकळत तिथे ओढली जाते.आजही काहीसे तसेच झाले.खिडकीकडे एक कटाक्ष टाकला आणि ती काहीशी माझीच वाट पाहत होती असे वाटले.
खिडकीजवळ गेले,तिथे बसले अन् चिमण्यांचा चिवचिवाट होऊ लागला आणि मला माझ्या अंतरंगात चालणाऱ्या चिवचिवाटांचा आवाज अधिकच स्पष्टपणे येऊ लागला.कित्येक उलाढाली चालल्या होत्या त्यावेळेस कोण जाणे...! खिडकीजवळ बसले तेव्हा दिसलेले बाहेरचे जग होते ते झाकोळल्या गेलेल्या एका निस्तेज सांजेप्रमाणे!बहुदा मनात चालणाऱ्या अस्वस्थतेमुळे सारे जग तसे भासत होते पण तेव्हा खिडकीच्या त्या खरेपणाचे मला कौतुक वाटले,कारण तिने तीच्याप्रमाणेच स्वच्छ असणाऱ्या काचेतून माझ्या मन:पटलाचे नितळ पण तितकेच क्लेशकारक दृश्य समोर ठेवले.तेव्हा तिचे न राहवून मला अप्रूप वाटले की, खिडकीसारखी एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा मनातले भाव इतक्या खऱ्या अर्थाने दाखवू शकते तर माणसांचे असे का नाही?ती खिडकी तेव्हा माझ्या हिशेबी जरा भावच खाऊन गेली.जेव्हापासून खिडकीत वेळ घालवत आहे तशी ती मला माझ्यातल्या 'मी'ला ओळखण्याची मुभा देतीये आणि ती रोज काहीशी वेगळी मला कळत चाललीये.ती माझ्याशी हितगुज करते.तिच्या स्फटिकाप्रमाणे शुभ्र काचा हे जग शुभ्र आहे असं सांगण्याचा नाहक प्रयत्न करतात पण जेव्हा खिडकीतून खिडकीबाहेर डोकावते तेव्हा जग काहीसे वेगळे भासते,मनाला न पटण्याजोगे!
थोडेसे निवांत क्षण आणि स्वतःच्या मन:पटलावर जमा झालेली धूळ बाजूला करण्यास मिळालेली ही नवी सोबती गरज लागेल तेव्हा माझी वाट पाहतच असेल याची खात्री आहे;कारण तिलाही मोकळे व्हायचे आहे कधीतरी खिडकीतून खिडकीबाहेर...!
©अदिती मळेकर.
Wednesday, 21 March 2018
आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे?
प्रत्येक दिवसाचे न्यूजपेपर हे विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचे एक ना एक उदाहरण हमखास देते.विद्यार्थी बेशिस्त झाले आहेत असे विद्यार्थ्याखेरीज प्रत्येक जण बोलतो.तसे बोलावे असे काही प्रकार घडलेही आहेत.परंतु माझ्या मते बेशिस्त विद्यार्थ्यांस बेशिस्त समाजच घडवीत असतो, हे अनेकजण विसरतात.विद्यार्थी बेशिस्त का वागतात,याचा विचार आणि त्या समस्येवर उपाय शोधणे यांचा आपल्याकडे अभावच आहे.
आजचा विद्यार्थी बेशिस्त नाही,तर कर्तृत्ववान आहे,तो एक पुस्तकी किडा राहिलेला नाही,तर त्याला सभोवतालच्या अनेक गोष्टींची जाणीव आहे.कॉम्प्युटरचा योग्य वापर तो करतो आहे. कॉम्प्युटरच्या वापरावरून पण आजचा विद्यार्थी बेशिस्त या उपाधीेस पात्र ठरतो.जणू काही आजचे विद्यार्थी बेेशिस्तीचे टॅग घेऊनच फिरत आहेत.लोक म्हणतात,आजचे विद्यार्थी बिघडले आहेत.फेसबुक,व्हॉटसअप सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर वर तशी उदाहरणे घडलेही आहेत.परंतु त्यास विद्यार्थ्यांना दोष देणे कितपत योग्य आहे?सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर हा विद्यार्थी चांगल्या कामांसाठी सुद्धा करतो.पण हा समाज प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांस वाईट दृष्टीच्या काम करण्या हेतूने पाहतो. ज्याप्रमाणे नाण्यास दोन बाजू असतात,तशाच प्रत्येक गोष्टीला चांगली व वाईट या दोन्ही बाजू असणे स्वाभाविकच असते.तासनतास साईट्सवर वेळ वाया घालवणे,यात आम्ही विद्यार्थी चुकतो पण त्यामुळे आम्ही बेशिस्त किंवा बेजबाबदार ठरत नाही.आजचा विद्यार्थी हा मल्टीटॅलेन्टेड आहे.आज प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी पुढे आहे.विचारशील आहे.सरकारच्या प्रत्येक निर्णयावर त्याचे ठाम मत आहे.तो ध्येयशून्य नाही तर ध्येयकेंद्रीत आहे.
आज विद्यार्थी अनेक छंद जोपासतो.ट्रेकिंगला जाणे,समाजसेवा म्हणून आदिवासी भागात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन शिकवणे,विविध उपक्रम राबवणे यांसारखी कामे करतो.तेव्हा टीका करणारे टिकाकार म्हणातात,'हल्ली कॉलेजमधून अभ्यासाऐवजी अशी ही नसती फॅडच जास्त असतात'. 'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' ही म्हण आज अस्तितवात नाही.कारण लादलेल्या किंवा अधिकार गाजवून शिस्त लावणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आणि कठीण आहे,असे मला वाटते.Discipline must be based on love,must be controlled by love. असे आम्ही विद्यार्थी मानतो.
जोपर्यंत अनाचारी,भ्रष्टाचार,स्वार्थी अधार्मिकता आजूबाजूला आहे,तोपर्यंत समाजास विद्यार्थी हा बेशिस्तच वाटेल.शिस्तबद्ध विद्यार्थी हा चारित्र्यसंपन्न विद्यार्थी,चारित्र्यसंपन्न विद्यार्थी हा चारित्र्याभष्ट समाजापोटी नाही जन्माला येऊ शकत.टीकाकारांना आजचे विद्यार्थी उद्दाम,उद्धट वाटतात.कारण त्यांच्या मते,आम्ही विद्यार्थी शिक्षकांना द्यावा तितका मान देत नाहीत.पण ही माणसे विद्यार्थ्यांची मने समजून घेतात का? 'आदर दाखवा' म्हणून कोणालाही आदर दाखवता येत नाही. ज्या व्यक्तीची वागणूक आदरास्पद आहे किंवा असते,यांच्यापुढे आम्ही विद्यार्थी कोणीही न सांगता आदराने नतमस्तक होतो.
आजच्या विद्यार्थ्यांस वेगवेगळ्या फॅशन करायला आवडते.हीरोहेरॉईनसना फॉलो करायला आवडते.तो पिक्चर मधील हेरोवर फिदा होतो,क्रिकेट स्टार वर फिदा होतो,यात विद्यार्थी बेशिस्त का ठरावेत? सर्व गोष्टी जरी विद्यार्थी करत असला तरी तो बेशिस्त नाही की अविवेकी नाही.आजचा विद्यार्थी अधिक प्रगल्भ,जबाबदार व विचारशील आहे.त्याला आपल्या हक्काची जाणीव आहे व त्याबद्दल आम्ही जागरूक आहोत.हक्क आणि कर्तव्ये यांची योग्य सांगड आम्ही घालतो.राष्ट्रावर येणाऱ्या,कोणत्याही आपत्तीच्या वेळी धावून जाणारा,हंड्यासारख्या नरबळी,बालविवाह यांसारख्या अयोग्य रूढींविरुद्ध लढणारा,बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या चीड आणणाऱ्या गोष्टींवर पेटून उठणारा ,वेळोवेळी रुग्णासाठी,जवानांसाठी रक्तदान करणारा आजचा विद्यार्थी बेशिस्त कसा?
-Aditi Malekar.
Wednesday, 7 March 2018
डीपी,स्टेटस अन् भगवा....विचारांचं काय?
वाफाळलेल्या पत्रातून...
प्रिय जन्म, प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भ...
-
आजकाल माझ्या मनात सतत घोंगावत राहणारा एकच प्रश्न आहे,खरंच आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे? आजकाल आम्हा विद्यार्थ्यांवर टीकेचा चौफेर ...
-
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असा एक तरी 'कट्टा' नक्कीच असतो. जिथे तो आपले एक एक क्षण मनमुरादपणे जगत असतो. जिथं त्याने मजा...
-
जेव्हापासून खिडकीत बसायला झालंय तेव्हापासून मी वेगळ्याच विश्वात रममाण होत चालली आहे.जराशी उसंत मिळाली की खिडकीची दारे मला आपसुकच...