Tuesday, 27 November 2018

राम मंदिर की रामराज्य?

              सर्वच राजकीय स्तरांतून आणि पर्यायाने संपूर्ण सामान्य जनमानसात गेल्या काही दिवसातच एका प्रश्नाने डोके वर काढले,तो म्हणजे राम मंदिर की रामराज्य? या प्रश्नांचे सुकाणू अधिक जलदगतीने पोहचवण्याचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले ते मनसेच्या व्यंगचित्रकारामुळे.कोणतेही संकट आले की आधी स्मरण होते ते रामाचे.संकटसमयी जर राम आठवला तर यात फारसे नवल नाहीच आणि आता तर ऐन निवडणुकांच्या तोंडावर राम हाच तारणहार असणारा हा एक 'राजकीय स्टंट' आहे यात मुळीच शंका नाही.म्हणून हा राम आणि रामरक्षा यांचा जप म्हणून राम आणि राममंदिर यांच्याभोवती सर्वच राजकीय पक्ष पिंगा घालताना दिसत आहेत.
                सेनेने थेट आयोध्या गाठून कमळाला अधिकच चिखलात रूतण्यास भाग पाडले.इकडे यांनी अयोध्या जवळ केली खरी पण हे वरवरचे आहे की खरेच श्रीरामभक्त आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.मनसेच्या सर्वेसर्वानी काढलेल्या व्यंगचित्रातून रामराज्य हवे होते, राममंदिर नव्हे असा टोला लगावला गेला.रामराज्य म्हणजे रामाचे राज्य नव्हे तर रामाची मूल्ये घेऊन जगणारे रामराज्यातील सामान्यजन.जिथे राजा व प्रजा यांना समान पारड्यात तोलले जायचे.जिथे जातीय वर्चस्व,दहशतवाद ,खून,हाणामारी,बलात्कार यांना थारा नव्हता.आज आपण रामायणातील कथा सांगताना शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा ऐकतो,जी की लोकांना राजाचे सामान्यपण आणि समानता यांचे सार्थ दर्शन देते.असे हेच दर्शन या राज्यात होणे या जन्मी तरी शक्य आहे काय?
                   ने म्हणजे नेक,ता म्हणजे तारणहार.असा खरं तर नेता या शब्दाचा अर्थ.पण येथे दिसणाऱ्या राज्यात जो लोकांचं नेतो तो नेता हा अर्थ रूढ होतोय.या राज्यातील नेता म्हणजेच राजा.असा राजा की ज्यात रामाचा लवलेशही नसावा.आज सरकारविरोधी बोलणाऱ्याचे काय होते हे न बोललेलेच बरे!कारण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याचा आमच्या राज्यात प्रघातच आहे.राजाची मर्जी राखण्यासाठी म्हणून इतर मंत्रीसुद्धा मूग गिळून गप्प आहेत. होयबा संस्कृती राबवण्याचा यांचा कल प्रकर्षाने दिसून येतोय.याचीच साक्ष हा चव्हाट्यावर आलेला वाद दर्शवतो.
                     स्त्रीदाक्षिण्य हे रामराज्याचे वैशिष्ट्य. असहाय अहीलेल्या रामाने मदत केली,मर्यादा ओलांडणाऱ्या शूर्पणखेला शिक्षा दिली.असे वर्तमानकाळात आजच्या स्त्रियांचे आहे का?आजच्या वर्तमानकाळात सर्वच बाबतीत ठणठणीत दुष्काळाच दिसतो.ना त्या निर्भिडपणे व्यक्त होतात ना मते मांडतात.एवढेच काय पण या उतरत्या कळेस चारचांद लावण्याचे लावले ते #meetoo ने.अशी वेळ ही या राज्यात यावी हीच खरी शोकांतिका आहे.राजाचे मुख्य कार्य हे जनतेत शांतता राखण्याचे असते.युध्याच्या वेळी राजा जनतेत अराजकता माजू नये यासाठी कटिबद्ध असतो आणि सद्य स्थितीत निवडणुका म्हणजे एक युद्धच आहे.ऐन निवडणुका तोंडावर असताना याच लोकांना नामी शस्त्र मिळाले ते म्हणजे 'राम' .पाहायला गेले तर ना यांच्या मनात राम ना बोलचालीत.
                  'प्राण जाये पर वचन ना जाये' याचेच डंके वाजवणारे हे लोक आपली पोळी मात्र चांगलीच भाजून घेत आहेत.सद्य स्थिती रामराज्याचे कोणतेच अवलोकन करताना दिसत नसेल तर राममंदिराची नेभळट आशा तरी काय कामाची?जिथे स्त्रियांच्या कर्तृत्वाची,कार्याची दखल घेतली जात नाही.तिचे अस्तित्वच मुळात धोक्यात आहे अशा राज्यात राममंदिर तरी काय कामाचे?वनवासी जाण्याची आज्ञा झाल्यावर सीतेने राज्यकारभार चालवावा अशी रामाने इच्छा दर्शवली.यातून रामराज्यातील स्त्रियांचे स्थान स्पष्ट होते.सद्य परिस्थितीत मात्र स्त्रियांचे पाय खेचण्याचेच दृश्य पहावयास मिळते.हा अजून एक पुरुषप्रधान संस्कृतीचा उत्तम नमुना म्हणता येईल.
                  रामराज्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण,कला ,आरोग्य यांना प्राधान्य.मात्र आजचे चित्र काही विपरितच आहे.सामान्य जनांसाठी चालू केलेल्या योजना त्या गरजूपर्यंत पोहचतच नाहीत हीच खरी परिस्थिती आहे.
                    इथे सगळे फक्त सत्तेचे उपासक आहेत.रामराज्य मागणाऱ्यांनी तरी नशिकात कुठे रामराज्य प्रस्थापित केले?नुसतीच आश्वासनांची सखरपेरणी करून टाळूवरचे लोणी खाणारी यांची जातच इथे अधोरेखित होते.जनतेला गरज ही राममंदिराची नव्हे तर रामराज्याचीच आहे.परंतु सल्ले आणि राजकीय टीकाटिप्पणी यातून फुरसत मिळेल तर हे साकार होईल.इथे कमळाने तरी नवीन असे काय केले,तर जनतेसाठी झटणाऱ्या तुकाराम मुंढेना बदलीची शिक्षा दिली.हेच ते रामराज्य आणि हेच ते इथले कायदे सगळेच धाब्यावर बसवलेले!
                   आमच्यासारख्या सामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून,गळचेपी करून राममंदिराचे स्वप्न कधीच साकार होणार नाही.जेव्हा मनातल्या. रामासाठी मंदिराचे दरवाजे खुले होतील तेव्हा कुठे रामराज्याचे आणि पर्यायाने राममंदिराचे स्वप्न सफल संपूर्ण होईल.
                                    ✍अदिती मळेकर.
                                      

Thursday, 1 November 2018

खिडकीतून खिडकीबाहेर

           जेव्हापासून खिडकीत बसायला झालंय तेव्हापासून मी वेगळ्याच विश्वात रममाण होत चालली आहे.जराशी उसंत मिळाली की खिडकीची दारे मला आपसुकच बोलवत असल्याचा क्षणभर भास होतो आणि मी नकळत तिथे ओढली जाते.आजही काहीसे तसेच झाले.खिडकीकडे एक कटाक्ष टाकला आणि ती काहीशी माझीच वाट पाहत होती असे वाटले.
             खिडकीजवळ गेले,तिथे बसले अन् चिमण्यांचा चिवचिवाट होऊ लागला आणि मला माझ्या अंतरंगात चालणाऱ्या चिवचिवाटांचा आवाज अधिकच स्पष्टपणे येऊ लागला.कित्येक उलाढाली चालल्या होत्या त्यावेळेस कोण जाणे...! खिडकीजवळ बसले तेव्हा दिसलेले बाहेरचे जग होते ते  झाकोळल्या गेलेल्या एका निस्तेज सांजेप्रमाणे!बहुदा मनात चालणाऱ्या अस्वस्थतेमुळे सारे जग तसे भासत होते पण तेव्हा खिडकीच्या त्या खरेपणाचे मला कौतुक वाटले,कारण तिने तीच्याप्रमाणेच स्वच्छ असणाऱ्या काचेतून माझ्या मन:पटलाचे नितळ पण तितकेच क्लेशकारक दृश्य समोर ठेवले.तेव्हा तिचे राहवून मला अप्रूप वाटले की, खिडकीसारखी एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा मनातले भाव इतक्या खऱ्या अर्थाने दाखवू शकते तर माणसांचे असे का नाही?ती खिडकी तेव्हा माझ्या हिशेबी जरा भावच खाऊन गेली.जेव्हापासून खिडकीत वेळ घालवत आहे तशी ती मला माझ्यातल्या 'मी'ला ओळखण्याची मुभा देतीये आणि ती रोज काहीशी वेगळी मला कळत चाललीये.ती माझ्याशी हितगुज करते.तिच्या स्फटिकाप्रमाणे शुभ्र काचा हे जग शुभ्र आहे असं सांगण्याचा नाहक प्रयत्न करतात पण जेव्हा खिडकीतून खिडकीबाहेर डोकावते तेव्हा जग काहीसे वेगळे भासते,मनाला न पटण्याजोगे!
              थोडेसे निवांत क्षण आणि स्वतःच्या मन:पटलावर जमा झालेली धूळ बाजूला करण्यास मिळालेली ही नवी सोबती गरज लागेल तेव्हा माझी वाट पाहतच असेल याची खात्री आहे;कारण तिलाही मोकळे व्हायचे आहे कधीतरी खिडकीतून खिडकीबाहेर...!
                                                         ©अदिती मळेकर.

वाफाळलेल्या पत्रातून...

प्रिय जन्म,               प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भ...