Wednesday, 21 March 2018

आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे?

          आजकाल माझ्या मनात सतत घोंगावत राहणारा एकच प्रश्न आहे,खरंच आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे? आजकाल आम्हा विद्यार्थ्यांवर टीकेचा चौफेर हल्ला होत आहे.कोणी म्हणतो,आजचे विद्यार्थी बेजाबदार आहेत,कोणी म्हणातो ध्येयशून्य आहेत.तर कोणी म्हणतो पथभ्रष्ट आहेत. विद्यार्थ्यांवर टीका कराव्या अशा काही घटना,त्याची दहावीस उदाहरणे घडली असतीलही.पण टीका करताना एकतर्फी विचार करणे आम्हा विद्यार्थ्यांवर अन्यायाचे आहे.यासंबंधात विद्यार्थ्यांची बाजूही लक्षात घ्यायला हवी.ती कोणीच लक्षात घेत नाहीत.
            प्रत्येक दिवसाचे न्यूजपेपर हे विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचे एक ना एक उदाहरण हमखास देते.विद्यार्थी बेशिस्त झाले आहेत असे विद्यार्थ्याखेरीज प्रत्येक जण बोलतो.तसे बोलावे असे काही प्रकार घडलेही आहेत.परंतु माझ्या मते बेशिस्त विद्यार्थ्यांस बेशिस्त समाजच घडवीत असतो, हे अनेकजण विसरतात.विद्यार्थी बेशिस्त का वागतात,याचा विचार आणि त्या समस्येवर उपाय शोधणे यांचा आपल्याकडे अभावच आहे.
            आजचा विद्यार्थी बेशिस्त नाही,तर कर्तृत्ववान आहे,तो एक पुस्तकी किडा राहिलेला नाही,तर त्याला सभोवतालच्या अनेक गोष्टींची जाणीव आहे.कॉम्प्युटरचा योग्य वापर तो करतो आहे. कॉम्प्युटरच्या वापरावरून पण आजचा विद्यार्थी बेशिस्त या उपाधीेस पात्र ठरतो.जणू काही आजचे विद्यार्थी बेेशिस्तीचे टॅग घेऊनच फिरत आहेत.लोक म्हणतात,आजचे विद्यार्थी बिघडले आहेत.फेसबुक,व्हॉटसअप सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर वर तशी उदाहरणे घडलेही आहेत.परंतु त्यास विद्यार्थ्यांना दोष देणे कितपत योग्य आहे?सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर हा विद्यार्थी चांगल्या कामांसाठी सुद्धा करतो.पण हा समाज प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांस वाईट दृष्टीच्या काम करण्या हेतूने पाहतो. ज्याप्रमाणे नाण्यास दोन बाजू असतात,तशाच प्रत्येक गोष्टीला चांगली व वाईट या दोन्ही बाजू असणे स्वाभाविकच असते.तासनतास साईट्सवर वेळ वाया घालवणे,यात आम्ही विद्यार्थी चुकतो पण त्यामुळे आम्ही बेशिस्त किंवा बेजबाबदार ठरत नाही.आजचा विद्यार्थी हा मल्टीटॅलेन्टेड आहे.आज प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी पुढे आहे.विचारशील आहे.सरकारच्या प्रत्येक निर्णयावर त्याचे ठाम मत आहे.तो ध्येयशून्य नाही तर ध्येयकेंद्रीत आहे.
               आज विद्यार्थी अनेक छंद जोपासतो.ट्रेकिंगला जाणे,समाजसेवा म्हणून आदिवासी भागात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन शिकवणे,विविध उपक्रम राबवणे यांसारखी कामे करतो.तेव्हा टीका करणारे टिकाकार म्हणातात,'हल्ली कॉलेजमधून अभ्यासाऐवजी अशी ही नसती फॅडच जास्त असतात'. 'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' ही म्हण आज अस्तितवात नाही.कारण लादलेल्या किंवा अधिकार गाजवून शिस्त लावणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आणि कठीण आहे,असे मला वाटते.Discipline must be based on love,must be controlled by love. असे आम्ही विद्यार्थी मानतो.
               जोपर्यंत अनाचारी,भ्रष्टाचार,स्वार्थी अधार्मिकता आजूबाजूला आहे,तोपर्यंत समाजास विद्यार्थी हा बेशिस्तच वाटेल.शिस्तबद्ध विद्यार्थी हा चारित्र्यसंपन्न विद्यार्थी,चारित्र्यसंपन्न विद्यार्थी हा चारित्र्याभष्ट समाजापोटी नाही जन्माला येऊ शकत.टीकाकारांना आजचे विद्यार्थी उद्दाम,उद्धट वाटतात.कारण त्यांच्या मते,आम्ही विद्यार्थी शिक्षकांना द्यावा तितका मान देत नाहीत.पण ही माणसे विद्यार्थ्यांची मने समजून घेतात का? 'आदर दाखवा' म्हणून कोणालाही आदर दाखवता येत नाही. ज्या व्यक्तीची वागणूक आदरास्पद आहे किंवा असते,यांच्यापुढे आम्ही विद्यार्थी कोणीही न सांगता आदराने नतमस्तक होतो.
             आजच्या विद्यार्थ्यांस वेगवेगळ्या फॅशन करायला आवडते.हीरोहेरॉईनसना फॉलो करायला आवडते.तो पिक्चर मधील हेरोवर फिदा होतो,क्रिकेट स्टार वर फिदा होतो,यात विद्यार्थी बेशिस्त का ठरावेत? सर्व गोष्टी जरी विद्यार्थी करत असला तरी तो बेशिस्त नाही की अविवेकी नाही.आजचा विद्यार्थी अधिक प्रगल्भ,जबाबदार व विचारशील आहे.त्याला आपल्या हक्काची जाणीव आहे व त्याबद्दल आम्ही जागरूक आहोत.हक्क आणि कर्तव्ये यांची योग्य सांगड आम्ही घालतो.राष्ट्रावर येणाऱ्या,कोणत्याही आपत्तीच्या  वेळी धावून जाणारा,हंड्यासारख्या नरबळी,बालविवाह यांसारख्या अयोग्य रूढींविरुद्ध  लढणारा,बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या चीड आणणाऱ्या गोष्टींवर पेटून उठणारा ,वेळोवेळी रुग्णासाठी,जवानांसाठी रक्तदान करणारा आजचा विद्यार्थी बेशिस्त कसा?
                                                                                                                                           -Aditi Malekar.

Wednesday, 7 March 2018

डीपी,स्टेटस अन् भगवा....विचारांचं काय?

           "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता‌‌|
          शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|"
              हे शब्द आहेत राजमुद्रेतले,जे शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत.हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी अर्थ त्यात सामावला आहे,तो असा, 'प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो आणि सारे विश्व त्याला जसे वंदन करतो,तशीच ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.'खरचं राजमुद्रा आणि तिचा लौकिक वाढतोय? प्रश्न तसा अनुत्तरीत,कारण आजवर घडणाऱ्या समाजातील घटना पाहता महाराजांच्या लौकिकास नक्कीच धक्का बसतो आहे,असे म्हणता येईल.
             आजच्या तरुणपिढीचा किंबहुना पूर्वापार चालत आलेल्या तडफदार तरुणाईचा 'आदर्श राजा' म्हणजे 'शिवाजी महाराज'.एक राजा जो जनतेसाठी जगला.एक राजा योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला.एक नेता ज्याने गुलामासारख जगणं नाकारलं आणि जन्म दिला प्रतिष्ठित अशा महाराष्ट्रातील तमाम जनतेला. असं म्हणतात की 'जन्मदात्याकडून उपजत काही गुण मुलामध्ये येतात.' परंतु सद्य परिस्थिती पाहता महाराजांनी घालून दिलेले आदर्श किंवा कोणताही विचार समजाच्या पथ्यी पडला नाही याचीच साक्ष देतो.
              शिवजयंती असो,शिवराज्याभिषेक असो नाहीतर शिवपुण्यातिथी असो,जागोजागी शिवाजी महाराजांचे भव्य पुतळे, महाराजांचे डीपी, स्टेटस व्हॉटसअप, फेसबुक वर अगदीच दिमाखात झळकतात.भगवा जागोजागी फडकतानाही दिसतो.या सर्व गोष्टीतून समाजमनाची महाराजांविषयीची असलेली आत्मियता,प्रेम,अभिमान याचे दर्शन देते. डीपी,स्टेटस वर झळकणारे महराजांचे विचार हे तेवढ्यापुरतेच मर्यादित असलेले दिसतात.कारण स्वतःला मर्द मराठा किंवा मर्द मावळा म्हणवणारा तरी महराजांचा कोणता आदर्श घेतो?
            स्वउद् घोषित महाराजांचे भक्त स्टेटस लिहितात,'एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करणारे आम्ही नाही,आम्ही तो हातच मुळासकट छाटून टाकतो.कारण आम्हा शिकवण महाराजांची अन्याय करायचा नाही अन् सहनही करायचा नाही'.अशाच बड्या बाता मारणारे भक्त एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा बघ्याची भूमिका पार पाडण्यात आपली धन्यता मानतात.अरे, तुमच्या गालावर मारल्यास तुम्ही तो हात छाटून टाकता तर स्त्रिजातीवर हात टाकणाऱ्या नाराधमचे हात का मुळासकट छाटले जात नाहीत?मग येथे महाराजांनी घालून दिलेले नियम फोल ठरतात.कारण 'येथे अन्याय होतो आणि सहनही केला जातो'.आज बलात्काऱ्यास शिक्षा व्हावी यासाठी मूकमोर्चे काढले जावे,याहून दुसरे दुर्दैव कोणते?कित्येक समाजातील मुलींचे  हकनाक बळी घेतले जातात तेव्हा त्यांच्या न्यायासाठी फक्त त्याच समाजातील लोक पुढे येऊन निषेध नोंदवतातम? इतर समाज तेव्हा कुठे असतो? महाराजांनी ना तेव्हा जातीचे राजकारण केले होते ना त्यांची शिकवण तसे करण्यास सांगते. तर मग आपण का आपल्या जातीव्यवस्थेशी एवढे बांधील राहावे?गरज आहे ती सर्वांनी एकत्र येऊन स्त्रियात्याचार रोखण्याची आणि महाराजांचे विचार अंमलात आणण्याची.
                  'भगवा' म्हणजे त्याग,बलिदान,ज्ञान, शुद्धता,सेवा, शौर्याचे प्रतीक.परंतु याचासुद्धा शिवभक्तांनी जातीच्या नावाखाली बाजार मांडला. भगवा म्हणजे समस्त हिंदू धर्माची शान व हिंदू राष्ट्राचा अभिमान.भगव्याच्या पवित्र छायेखाली कित्येक शूर विरांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण त्यागले आणि आज हाच भगवा देशातील काही मतीभ्रष्ट, माथेफिरू लोकांमुळे धर्माचे राजकारण करण्यासाठी वापरला जातो,यातच खरी शोकांतिका आहे.आज भारतीय दारिद्र्य, बेकारी,अनिष्ट रूढी,आरक्षण यांच्या दबावाखली भरडला जातोय,तरी आजचा तरुण हा फक्त डीपी,स्टेटस आणि भगवा यांच्यामार्फत आपण प्रसिद्ध कसे होऊ याचाच विचार करतोय.लोकशाहीची बीजे पेरून गेलेल्या प्रजाहितदक्ष राजाला हुकुमशाही आणि अन्यायाच्या डीपी, स्टेटस आणि भगव्याच्या बेड्या मध्ये अडकवले गेले तेव्हाच महाराजांच्या विचारपत्रांच्या पत्रावळी झाल्या.जेथे आपण भगव्यास शौर्याचे प्रतिक मानले तेथेच काही तर्कट लोकांनी भिमा-कोरेगाव प्रकरणावर निषेध,दंगली इ.इ.करण्यासाठी अमानुषपणे भगव्याचा वापर केला.
                  'दिधले असे हे जग तये आम्हासी खेळावया|'असे मानून उन्मत्तपणे अजूनही भगव्यास खेळविले जात आहे. तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे,अग्नीच्या ज्वलंत ज्वाली प्रमाणे ज्याची कीर्ती आहे अशा या भगव्यास जातीच्या नावाचे लेबलींग देऊन जाळले तेव्हा फडफडणारा भगवा तप्त ज्वालांच्या आगीत सुद्धा शिथील झाल्यासारखा भासतो.
                    'झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
                    जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
            घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही...'असे स्टेटस टाकणाऱ्या मर्दानो एकदा स्वतःला विचारून पाहा,श्रींच्या स्वराज्यात जागलेले तुम्ही 'मर्द मावळे' आहात?नक्कीच नाही.कारण जागलेला मर्द मावळा अन्यायाचे अफाट स्तोम मानले असताना झोपेचे सोंग घेणे शक्य नाही.महाराजांचे विचार जसे आपण डीपी,स्टेटस यांच्यावर अगदी सहजपणे ठेवतो तेवढ्याच सहजतेने जर ते मनात कोरून त्याची अंमलबजावणी झाली तरच छत्रपतींच्या विचारांची सार्थकता होईल.
                आजची तरुणाई वासनेत,अंध अफवा यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली आहे.अशाच माथेफिरूना व्हॉटसअॅप,फेसबुक यांसारखी सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे आयते कुलितच हातात आले याची जाण देतात.मोठ्या प्रमाणावर चुकीच्या माहितीच्या प्रसाराने, महाराजांच्या नावाखाली सरकारच्या कित्येक योजनांवर टीका,निषेध यांचे लोळ उठवले जात आहेत.अनेक प्रकारे अनेक वर्षांपासून चालत आलेले प्रकरण संपून जावे यासाठी सुद्धा अनेक स्टेटस आणि डीपीच्या माध्यमातून जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. जनप्रक्षोभ मोठ्या प्रमाणावर उसळला आणि जनतेस जातीय दंगलीचा सामना करावा लागला किंबहुना आजही करतोय. महाराजांनी धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता,मानवतावाद या मूल्यांची बीजे रोवली असताना 'धर्मनिरपेक्ष राजाचे' स्मारक बांधण्यासाठी सुद्धा सोशल नेटवर्किंग साईट्स द्वारे असंतोषाचे उद्रेक उफाळून येतात.महाराजांचे विचार हे 'हिंदू- मुस्लीम समानता','सर्वधर्मसमभाव','स्त्रीपुरूष समानता'यांची शिकवण देतात तर आम्हा आजच्या मावळ्यांचे विचार हे अधोगती आणि दहशतीच्या गर्तेत खोलवर चाललेले दिसत आहेत.
        'चिंता ना भिती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती,
         भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे 
         घाबरतोस कोणाला वेड्या तू तर शिवबाचा वाघ आहे
       ज्याचे नाव घेता सळसळते रक्त अशा शिवभाचे आम्ही भक्त...'स्वतःस "शिवबाचा वाघ" म्हणवून घेणारे अंगात शेळीचे बळ देखील सामावू शकत नाहीत.फक्त शिवबाचे नाव घेऊन अथवा त्यांच्या नावाचे जयघोष करून उपयोग नाही तर महाराजांच्या विचारांना आपल्या चालू आयुष्यात स्थान देणे गरजेचे आहे.जर सळसळणाऱ्या भगव्या रक्ताचा एखाद्या गरजवंतास,अन्याय रोखण्यासाठी उपयोग झाला नाही तर तुम्हा तरुणाईचे स्टेटस हे फक्त आणि फक्त निरुपयोगी शब्दच राहतील.स्फूर्तिदायी स्टेटस, डीपी जसे निवडून ठेवले जातात तसेच जर चांगले विचार तेवढे निवडून घेतले तर छत्रपतींच्या स्वराज्याला अर्थ उरेल.
               शिवरायांचे विचार हे प्रबळ अशा परसत्तेशी झुंज देण्याचे,अंत:करणात अतूट व आखुट असा ध्येयवाद,आशावाद निर्माण करणारे,भूतकाळात सुद्धा त्यागाचे,पराक्रमाचे, ध्येयोत्क्तटाचे प्रसंग यासर्वांची स्फूर्ती देतात.इतकेच नव्हे तर शिवरायांचे विचार माणसाला माणूस म्हणून जगू देणारे...हात देण्याची वृत्ती जोपासणारे...प्रत्येक श्वास मोकळेपणाने घेऊ देणारे...तरुणाईच्या ऊर्जेला अनुभवाचे बळ देणारे...हे विचार समस्तांच्या 'दैवताचे'.
                  अशा जाज्वल्यमयी,स्फूर्तिदायी विचारांचे स्थान फक्त डीपी,स्टेटस आणि भगव्यापुरते संकुचित न ठेवता त्यांचा स्वतः च्या आयुष्यात उपयोग करावा.फक्त डीपी,स्टेटस ठेवून तुमच्या किंवा आमच्या विचारात फरक पडणार नाही.समाजातील चालू असणारी अंधाधुंदी जर अशीच चालू राहिली तर खरेच डीपी,स्टेटस अन् भगवा...विचारांचं काय? असंच म्हणावं लागेल.तेव्हा वेळ आली आहे विचार बदलण्याची. स्वत:ला जागे करण्याची...!!!
                                                               ©अदिती मळेकर

              
                  

वाफाळलेल्या पत्रातून...

प्रिय जन्म,               प्रियच आहेस तू मला. कारण, सध्या तुझी किंमत करणारे कमीच उरले आहेत. असं म्हणतात की, "आयुष्यातील सगळ्यात सुंदर भ...